वधू - वर मेळावा संयोजकाचे मनोगत

मुला - मुलींची लग्नं जमविणे हे अत्यंत कठीण बाब असल्याची जाणीव वधू - वरांच्या पालकांना येत असल्याची उदाहरणे नजरेत आली  आहेत. मुला - मुलींची लग्नं जमावी याकरिता अनेक पालक मंडळी अथवा  त्यांचे नातेवाईक आणि हितचिंतक वधू - वर मेळावा संयोजाकाकडे धाव घेतात व आपल्या मुला - मुलींची नांवे केंद्राकडे नोंदवितात . नावे नोंदविल्यानंतर वधू - वर पालकांना मुला - मुलींची माहिती वधू - वर मेळावा प्रमुखांकडून दिली जाते . महाराष्ट्रात वधू - वर मेळावा अथवा केंद्र चालविणे ही जरी सामाजिक सेवा असली तरी त्यात वेगळे स्वरूप प्राप्त होऊ लागण्याची मूर्तिमंत उदाहरणे डोळ्यापुढे आली आहेत. याचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. एवढेच नव्हे तर कित्येक वधू - वर पालाकांची मते आहेत.  परंतु उघड मत व्यक्त न करता त्यांच्या कडूनच  म्हणजे वधू - वर मेळावा संयोजकांकडून अथवा केंद्र प्रमुखांकडून अहिकाधिक स्थळांची माहिती प्राप्त करण्याचे प्रयत्नात असतात. 
महाराष्ट्रात विविध जातीकरिता अनेक वधू - वर संशोधन केंद्र आहेत व त्यांची फी जवळ जवळ ५१ रुपया पासून २००० रुपया पर्यंत  आहे. काही वधू - वर संशोधन केंद्र जातीचाच म्हणजे विशिष्ट जातीची स्थळे त्यांच्याकडे मिळू शकतात. आपल्या मुलीला अथवा मुलाला अनुरूप असे स्थळ शोधण्यात मुला- मुलींचे आई - वडील शोधात असतात. त्याकरिता आपल्या नातेवाईक मंडळीना सांगण्यापेक्षा  उत्तम स्थळ मिळू शकेल या आशेने आपल्या मुला - मुलींची  नावे वधू - वर सूचक केंद्रात नोंदवितात. मुला मुलींची नांवे नोंद करावयाची म्हटले कि मुला - मुलींची आणि कुटुंबाची माहिती एका विहित नमुन्यात जन्मपत्रिकेच्या माहिती सह वधू - वर संचालकास द्यावयाची असते. तदनंतर केंद्र संचालक सदरची माहिती स्वीकारतात. 
मुला-मुलींची लग्नं जमविण्यासाठी पालक मंडळी हजारो रुपये खर्च करावयाच्या तयारीत असतात.परंतु नांव नोंदणीसाठी फी अदा करण्यास मागे - पुढे पाहणारी मंडळी  बरीच आढळतात केंद्रात अनेक मुला-मुलींची माहिती प्राप्त झाल्यावर केंद्र संचालक त्या मुला - मुलीची माहिती एका विशिष्ट फाईल मध्ये  संग्रह करून ठेवतात. उदा. पदवीधर अथवा पदवीपर्यंत , शिक्षण झालेले डॉक्टर, इंजिनियर , घटस्फोटीत इत्यादी. केंद्र्प्रमुखांकडून दिल्या जाणाऱ्या फार्ममधील विचारणा केलेली माहिती पालक संपूर्णपणे देत नाहीत. त्यामुळे एखाद्यास ते स्थळ पाहू इच्छित असेल तर अपूर्ण माहिती असलेल्या स्थळांकडे दुर्लक्ष होतो. वास्तविक वधू - वर मेळावा संयोजकाकडे असणारी माहिती तंतोतंत योग्य असेल तर ज्याला हवी असेल ती माहिती पडताळणी करावयास सुलभ होते. वधू - वर सूचक केंद्राचे प्रमुख कार्य म्हणजे स्थळ सुचविणे. तदनंतर स्थळांची सखोल चौकशी करणे पालकांचे काम आहे असे माझे मत आहे. अन्यथा आपल्या नशिबाने जर बरा वाईट अनुभव आला तर केंद्र संचालकास दोष देणे अयोग्य आहे . 
वधू - वर सूचक केंद्रातून एकावेळी तीन - चार स्थळे सुचविली जातात. अथवा केंद्राच्या कार्यालयात वधू - वरांची माहिती पहावयास मिळते.  त्यातूनच आपण आपणास योग्य वाटणाऱ्या स्थळांची माहिती प्राप्त करावी व पुढील संशोधन सुरु करावे. त्यातून यश प्राप्त झाले नाही तर पुन्हा वधू - वर सूचक केंद्राच्या संचालकास भेटणे हा कार्यक्रम मुला - मुलींचे लग्नं जमेपर्यंत पालकांना करावा लागतो. वधू - वर मेळावा आयोजित करावयाचा म्हटला कि त्यात अनेक प्रकारची तयारी करावी लागते. एकतर प्रसिद्धीचे माध्यम उदा. दैनिक वर्तमानपत्रातून प्रसिद्धी  दिली जाते. परंतु जाहिरात करायची झाल्यास जाहिरातीची किंमत अदा करावी लागते. वधू - वर पालकांनी जी माहिती केंद्रात नोंदवली असेल त्या पालकांना मेळाव्यात आमंत्रित करावे लागते. कार्यालय भाड्याने घ्यावे लागते . वधू - वर मेळावा भरविणे ही बाब अत्यंत चांगली  आहे कि जेणे करून मुला - मुलींचे प्रत्यक्ष पाहण्याचा योग या मेळाव्यातून मिळतो वधू - वर मेळावा आयोजित करणाऱ्या संयोजकांचा एक सहकारी या नात्याने आलेले अनुभव अतिशय निराळे व गमतीदार आहेत.  वधू  -वर मेळाव्यास मुले हजर राहण्यास विशेष रस घेत नाहीत. उलट मुलांचे पालक हजर राहतात. संयोजकाचे म्हणणे असे असते कि पालकांनी आपआपल्या  मुला - मुलीना मेळाव्यात आणावे . परंतु काहीतरी सबब सांगून पालकच वधू -वर संशोधनात असतात . मेळावा म्हणजे काय ? मुला - मुलींनी स्वतःची माहिती स्टेजवर येवून समोर बसलेल्या पालक मंडळींना सांगावयाची माहिती सांगत असताना स्वतः वाचून दाखविणारा फॉर्म नं . सांगावयाचा व स्वतःची माहिती स्वतःच वाचून दाखवायची आणि मुलगा अथवा मुलगी कशी असावी या बद्दलची अपेक्षा व्यक्त करावयाची. वधू - वर माहिती सांगताना एखादे स्थळ एखाद्याला योग्य वाटेल तर त्या मुला - मुलींचे पालकांना योग्य वाटणाऱ्या स्थळांचे नाव अथवा क्रमांक केंद्र संचालकास सांगावयाचे म्हणजे त्या स्थळाबाबत  अधिकाधिक माहिती देणे - घेणे सुलभ होते. काही पालकांच्या वधू - वराबद्दल अपेक्षा मात्र अतिशय वेगळ्या असतात त्या बाबत पालकांची कीव करावीशी वाटते आणि त्यांची समजूत काढणे अतिशय कठीण बाब होऊन बसते . उदा.असे सुशिक्षित पालकांच्या बाबतीत आढळते. शिक्षक पेशातील म्हणजे शिक्षक व्यवसायातील मुलांना अथवा मुलींना शिक्षकांची नोकरी असलेल्या स्थळाच्या शोधार्थ असतात . तर डॉक्टर मुले, डॉक्टर मुलगी पाहण्यातच गर्क असतात. वास्तविक तसे असणे स्वाभाविक आहे. कारण भावी आयुष्याचा प्रश्न आहे. 
जन्मपत्रिका जुळते कि नाही पाहणे हे एक फ्याड होऊन बसले  आहे. जन्मपत्रिका पाहूनसुद्धा काही विवाहीतांचे संबंध बिघडले आहेत. मग त्यात दोष कोणाचा हा एक संशोधनाचा विषय आहे. परंतु सर्व काही जमले व स्थळास नकारात्मक उत्तर देण्यास पत्रिकेचा आधार घेणारी मंडळी अनेक आढळतात मुलीची पत्रिका जमत नाही हे कारण सांगून मोकळे होणारे मुलांचे पालक आढळतात. काही चाणाक्ष पालक मंडळी प्रथमतः जन्मपत्रिका पाहणार तदनंतर मुलाने मुलगी पाहावयाची नंतर घरातील नातेवाईकांनी मुलगी पाहण्याचा व एकमुखी निर्णय होईपर्यंत विचार करत स्तब्ध राहावे . परंतु स्वतःला देखील मुली आहेत याचा विसर लोकांना पडू नये असे वाटते.  
एखादे स्थळ योग्य वाटत असेल तर स्पष्ट नकार देण्यास मुला - मुलींच्या आई - वडिलांनी मागे पुढे पाहू नये कारण निष्कारण आपला निर्णय लांबणीवर का टाकावा ? प्रथमतः एकमेकांच्या स्थळाबाबत माहिती जाणून घेणे व माहिती प्राप्त करून घेण्यात संकोच मानू नये त्यापेक्षा स्पष्टोक्ती असावी असे म्हटले तर कोणाचेही दुमत होणार नाही.
 मेळाव्यातून लग्न जमले तर पन्नास पैश्याचे पोस्ट कार्डनेसुध्दा वधू - वर सूचक केंद्रास माहिती न कळविणारी मंडळी आढळतात. मेळाव्यातून जर लग्न जमले असेल तर त्यात कमीपणा मानण्याचे कारणच नाही. या उलट वधू-वर केंद्रास आपला विचार आमच्या केंद्रामार्फत जमला असे चार ओळीचे पत्र जर त्या केंद्र संचालकास प्राप्त झाले तर त्या केंद्र संचालकाचा आनंद निश्चितच द्विगुणीत होईल असे वाटते. पण एकदा का लग्न जमले तर केंद्र संचालकास पत्र पाठविण्यासाठी वेळ कुणाला आहे? यामुळे ज्यांचे लग्न झाले असेल त्यांचेकडे  एखाद्या मुला-मुलींचे पालक गेले असतील तर अगदी हसून सांगतात  कि आमच्या मुला मुलीचे लग्न झाले व अपत्यही झाले. मग पालकच वधू-वर  केंद्र संचालकास सांगतात कि ज्यांचे लग्न झाले असेल त्यांची माहिती त्यांच्या केंद्रातून काढून टाकणे भाग आहे. 
एकंदरीत वधू-वर मेळाव्यातून अनेक विवाह जमावे अशा प्रयत्नात संयोजक असतात. परंतु आता मेळाव्यात मुलांचे प्रमाण कमी आहे तर मुलींच्या स्थळांची संख्या बरीच आहे . सरकारी नोकरी करणारी मुले कमी आढळतात तर नोकरी करणाऱ्या मुलांना नोकरी करणारीच मुलगी हवी असा अट्टाहास असतो . विवाह जमविण्यासाठी तडजोड होणे अतिशय महत्वाची बाब आहे. परंतु विचार करणाऱ्या मंडळींचे प्रमाण अतिशय अल्प आहे. स्थळ योग्य जरी वाटत असले तरी अपेक्षा मात्र वेगळ्या व्यक्त करतात . स्थळ जर एकमेकांच्या पसंत आल्यास अपेक्षा करणे चुकीचे आहे. पण मुलांच्याकडील मंडळींचा वरचष्मा असतो.
वधू-वर सूचक केंद्राकडे सर्वच थरातील वधू-वर असतात. त्यामध्ये गरीब श्रीमंत ,सुशिक्षित अशिक्षित मंडळी सुद्धा असतात. मुला - मुलींचे लग्नं कसे जमेल या विवंचनेत असतात कि जेणे करून स्थळ प्राप्त करणे महत्वाचे असते . लग्न जमविणे हा एक छंद जोपासण्यासाठी काम करणारी मंडळी आपल्या समाजाकरिता झटत असतात कि त्यांना वधू-वरांच्या पालकांकडून काही एक अपेक्षा नसते. परंतु विवाह जमविण्याचा एक दुवा प्राप्त करण्यात एक मोठा आनंद वाटणारा, एक सुखद समाधान प्राप्त करण्यासाठी धडपडणारी मंडळी आढळतात. आपण आपल्या मुला मुलींची लग्न जमविण्यासाठी चारचौघात बोलले पाहिजे ही बाब आवर्जून सांगावी लागते. स्वतःची मुलगी अथवा मुलांचे यंदा कर्तव्य आहे असे सांगण्यात अजिबात संकोचू नये. वधू -वर सूचक केंद्र प्रमुखास समाजातील मंडळीची माहिती व्यापक प्रमाणात असणे जरुरीचे आहे. 
ज्या मुला- मुलींची लग्नं जमत नाहीत अशी पालक मंडळी वधू-वर सूचक केंद्राकडे पळतात असा गैरसमज काही मंडळी करतात. परंतु सदर लेखाद्वारे असे ठामपणे सांगावयाचे आहे वय ३२ झालं आहे पण कुठेच बोलाचालीचा योग जुळत नाही, काळसर्प, सौम्य मंगळदोष , जन्म मूळनक्षत्रावर असलेल्या सासऱ्याला घातक, पितृसुख कमी आहे अशा दुषित योगावरती शांतीविधी पर्याय काढून अडलेले भाग्य मार्गी लावावे पण थांबून राहू नये. वधू-वर सूचक केंद्रातून अनेक लग्ने जमलेली आहेत कि  ती विवाहित मंडळी वधू-वर सूचक केंद्राकडे जाण्याचा सल्ला देतात . मुलगा अथवा मुलगी पाहण्यात जाणारा वेळ खर्च यास फाटा द्यावयाचा असेल तर वधू-वरच्या पालकांनी योग्य अशा वधू-वर सूचक केंद्राकडून मदत प्राप्त करण्यात कमीपणा मानू नये.  उलट वधू-वर सूचक केंद्रातून अधिकाधिक लग्न कशी जुळतील याचा विचार प्रामुख्याने करणे ही काळाची गरज आहे हे ब्रीद वाक्य लक्षात घेतले तर लग्न जमविणे जटील प्रश्न सोडविण्यास मोठी मदत होईल ही बाब वधू-वरांच्या पालक मंडळींनी लक्षात ठेवली पाहिजे हा या लेखापाठीमागचा प्रमुख उद्धेश आहे.   

||नांदावी सुखसागरी वधू-वरे ऐसे करी ईश्वरा||
||कल्याणमस्तु||